रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेचा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यातच सोमवारी रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवण्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली. यासारख्या अफवेमुळे प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दुसरीकडे पाहिले तर रेल्वे स्थानक परिसरात कोणीही सहज प्रवेश करू शकते. सध्या रेल्वे बंद असल्याने चोर्या कमी झाल्या आहेत. मात्र तरी देखील रेल्वे स्थानक परिसर वार्यावरच आहे.
गेले अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानक परिसरातील प्रवेशद्वारासमोर मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहे. याशिवाय रेल्वे स्थानकाच्या काही परिसरातून सहज कोणीही येऊ शकतो. यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर औरंगाबाद ते मुकुंदवाडी, चिकलठाणा दरम्यान देखील असुरक्षितता आहे. रेल्वे चा स्पीड याठिकाणी कमी असतो. सध्या लॉकडाऊननंतर केवळ अमृतसर-नांदेड आणि नांदेड अमृतसर रेल्वे धावत आहे. या रेल्वे गेल्यानंतर रेल्वे स्थानकावर कोणीही नसते. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावर आणखी सुरक्षा वाढविली पाहिजे. असे देखील प्रवाशांकडून बोलले जात आहे.
बॅग स्कॅनर नाही
राज्यातील अनेक रेल्वे स्थानकावर प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर आहेत. बॅग स्कॅनर देखील बसविण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशांकडे तिकीट आहे की नाही याची देखील तपासणी केली जाते. परंतु औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात ना मेटल डिटेक्टर बसविले आणि बॅग स्कॅनर देखील नाही. त्यामुळे प्रवाशांच्या बॅग ची तपासणी करण्यात येत नाहीत. यामुळे देखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉम्बच्या अफवेनंतर प्रवाशांची तपासणी
सोमवारी रेल्वे स्थानक परिसरात बॉम्ब च्या अफवेच्या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर एकूण 42 सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने सुरक्षेसाठी 24 तास लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तसेच हॅन्ड मेटल डिटेक्टरद्वारे प्रवाशांची तपासणी देखील केली जात असल्याचे आरपीएफ पोलीसांनी सांगितले.